मुंबई : महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लसींचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या टीकेला मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.आपले अपयश महाराष्ट्र सरकार लपवत नाही. राजेश टोपेच या बाबतीत जास्त सांगू शकतील. पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचा, संकटात आणण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. जागतिक आरोग्य संघटनादेखील महाराष्ट्र सरकार काय करत आहे याची दखल घेत आहे. त्याचबरोबर गुजरात उच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र एक मोठे राज्य असल्यामुळे सर्वात जास्त दबाव आहे. आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून लसींचा तुटवडा असल्यासंदर्भात केली गेलेली वक्तव्य म्हणजे कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.