
अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मनोज सुवालाल गुंदेचा यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची 24 पदाधिकार्यांची कार्यकारिणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने मुंबईतून जाहीर केली.
अहमदनगर (दि १६ जानेवारी २०२१) : अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मनोज सुवालाल गुंदेचा यांची निवड करण्यात आली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत येणार्या नवीन ब्लॉक अध्यक्षांसह शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची 24 पदाधिकार्यांची कार्यकारिणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने मुंबईतून जाहीर केली आहे.पक्षांतर्गत कुरघोडींची मागील दोन दिवसांपासून शहरामध्ये चर्चा सुरू होती. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका गटाची बैठक पार पडली होती.माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी या बैठकीत किरण काळे यांच्यावर टीका केली होती. यामुळे विखे भाजपमध्ये असून देखील विखे गट शहर काँग्रेसमध्ये आपले अस्तित्त्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र या बैठकीनंतर बाळासाहेब भुजबळ यांचीच प्रदेश काँग्रेसने डच्चू देत उचलबांगडी केल्यामुळे या गटाचे नेतृत्व करणार्या विनायक देशमुख यांना ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे.
मनोज गुंदेचा यांची वर्णी लावून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारत पक्षांतर्गत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे.गुंदेचा हे काँग्रेसचे निष्ठावंत स्व. सुवालाल गुंदेचा यांचे चिरंजीव आहेत. गुंदेचा यांच्या निमित्ताने शहरातील मोठ्या संख्येने असणार्या जैन समाजाला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले आहे.काळे यांच्या मर्जीतील गुंदेचा यांची ब्लॉक अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे काळे यांची शहर काँग्रेसवर शतप्रतिशत एकहाती पकड असल्याचे, त्याचबरोबर ना. बाळासाहेब थोरातांचे बळ हे काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कार्यकारिणीत जुन्या-नव्यांचा मेळ घालत नवीन तरुण चेहर्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टरेट पदाधिकार्यांचा समावेश असून तीन वकिलांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्र,माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, कामगार, व्यापार, सामाजिक, सांस्कृतिक आदी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना संधी देण्यात आली असून महिलांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीमध्ये गुन्हेगारी पोर्शभूमीच्या एकाही व्यक्तीला स्थान देण्यात आलेले नाही.
