
बेळगाव: “दिल्लीश्वरांना” नेहमीच खूश करण्यात देवेंद्र फडणवीस व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रात आम्हाला याचा प्रत्यय येत असतो. आताही बेळगावातील पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करून त्यांनी पुन्हा एकदा मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचं काम केलं आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज केला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार असलेल्या शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच इथल्या मराठी जणांना व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.
त्याच अनुषंगाने शुभम शेळके यांनाही पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठी जणांच्या हक्कासाठी या भागात आंदोलनं केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जणांची एकजूट कायम राहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
