पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली “राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत, ते कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठिशी घालणार नाहीत”, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे.चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केल्यानंतर भाजपने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून अधिवेशन रोखून धरण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले. “तुम्हाला काय वाटतं ? राज्याचे मुख्यमंत्री शांतपणे बसले आहेत का ? राज्यात कोण काय बोलतंय याकडे त्यांचं लक्ष आहे. ते जागरूक मुख्यमंत्री आहेत. त्यांचं प्रत्येक घडामोडीकडे लक्ष आहे. कोणत्याही गोष्टीचा तपास पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर बोला. मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणालाही पाठिशी घालणार नाहीत”, असं राऊत म्हणाले.