
अहमदनगर (दि २७ फेब्रुवारी २०२१) : जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कल्याण, अहमदनगर, नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ३५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.कल्याण आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे म्हणून मागणी होती. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राबरोबरच या मार्गावरुन जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रास्थानी येणाऱ्या प्रवासी वाहतूकीची वर्दळ लक्षात घेवून या महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या रस्त्याच्या कामाच्या दाखल झालेल्या प्रस्तावास मंजुरी मिळून ३५.४२ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याचे खा.विखे पाटील यांनी सांगितले.
मंजुर झालेल्या या निधीतून कल्याण चौक ते सक्कर चौक ( ६ किमी.) आणि स्टेट बँकेपासून ते चाँदबीबी महाल ( १० किमी.), चाँदबीबी महाल ते मेहकरी (४ किमी.) अशा अंतराचे काम टप्प्याटप्प्याने पुर्ण केले जाणार आहे. या मार्गाला निधी उपलब्ध झाल्याने मोठ्या शहरांना जोडणाऱ्या वाहतूकीलाही मोठी मदत होवून जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही या मार्गामुळे फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने नगर शहरातील रेल्वे पुलापासून ते सक्कर चौक या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रेल्वे पूल ते सीना नदी पात्रापर्यंत काँक्रीट गटारच्या कामाचा समावेश करण्यात आले असल्याचे खा.विखे पाटील यांनी सांगितले.
