
अहमदनगर (दि १२ फेब्रुवारी २०२१) : शिक्षणातून पदवी मिळवित असताना सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने जोपासावी. समाजातील विविध प्रश्न प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून काम करावे. शिक्षणामध्ये ध्येय निश्चित करुन वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. यासाठी जिद्द व कष्टाची आवश्यकता आहे. यश संपादन करीत असताना आहार विचार, व्यायाम, अध्यात्म वाचन यांची जोड असणे गरजेचे आहे. पाणी व पर्यावरण मनुष्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे, दिवसेंदिवस पर्यावरणाच्या बदलामुळे मनुष्याची आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी पर्यावरणावर समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. विक्रांत पळसकर याने आपल्या मेहनतीच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन नाव रुपास आणले, असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.
विक्रांत विलासराव पळसकर याने वयाच्या 22 व्या वर्षी सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याबद्दल कौटुंबिक मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार करताना आ. अरुणकाका जगताप व पदाश्री पोपटराव पवार. समवेत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, नगर रचनाकार पुणे श्रीकांत प्रभुणे, अनिल मुरकुटे, मिनाक्षी पळसकर, आदी उपस्थित होते.
यावेळी आ. अरुणकाका जगताप म्हणाले की, शिक्षणाबरोबर आजच्या विद्यार्थ्याला संस्काराची, अध्यात्मिकता व धार्मिकतेची खरी गरज आहे. कारण आजचा युवक संस्कारी आणि अध्यात्मिक असेल तर देशाच्या उन्नतीत नक्कीच भर पडेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आजचा विद्यार्थी आपली संस्कृती, परंपरा विसरत चालला आहे. त्यांना वारंवार आपल्या संस्कारांची जाणीव करत राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना विक्रांत पळसकर म्हणाला की, सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने तसेच ध्येय व चिकाटीमुळे मी हे यश संपादन करू शकलो. मला यासाठी माझ्या शिक्षकांबरोबरच कौटुंबिक आधार मिळाल्याने खूप आधार मिळाला. त्यामुळे माझ्या यशात एकट्याचा हात नसून यामध्ये सर्व हितचिंतक सहभागी आहेत. असे तो म्हणाला. यावेळी द्रिग्विजय आहेर, विक्रांत देशमुख, श्रीकांत प्रभुणे आदींची भाषणे झाली. अनिल मुरकुटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विलासराव पळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
