(@ghulamnazad)

शरद पवार यांनी राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांना पाडण्यासाठी कसा प्रयत्न केला याचा किस्साही ऐकवला. ते म्हणाले की, 1982 च्या निवडणुकीची ही गोष्ट आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण ते महाराष्ट्रातील वाशिम सारख्या दुर्गम भागातून निवडणुकीला उभे राहिले. खरे तर वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नसायचे. त्याकाळात आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही ठरवलं, आझाद यांना निवडून द्यायचं नाही. त्यांना पाडायचं. आम्ही खूप प्रयत्न केला. आझाद यांच्या विरोधात प्रचाारचं रान उठवलं. पण तरीही आझाद निवडून आले. त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 

जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते : पवार

गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेतही खासदार म्हणून काम पाहिलं. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. संसदीय आणि राजकीय अनुभव असलेले आझाद हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी देशहितासाठी नेहमीच महत्त्व दिलं आहे. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. आज काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात आझाद यांची गरज असताना ते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांची आजही गरज आहे. त्यांची जागा घेणं कठीण आहे. उद्या काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यास ते परत संसदेत येतील अशी आशा आहे, असंही पवार म्हणाले.