अहमदनगर (दि २५ जानेवारी २०२१) : अहमदनगर शहराला मुळाधरणावरून पाणीपुरवठा करणारी योजनेला सुमारे 45 वर्षे झाली असल्यामुळे या योजनेला अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. त्याचबरोबर अहमदनगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून मोठी लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी फेज 2 पाणी योजनेचा निधी उपलब्ध झाला होता. त्याचबरोबर अमृत पाणी योजनेतून मुळाधरणातून वसंत टेकडी पर्यंत नवीन पाणी योजनेला मंजुरी मिळाली.

पाणी साठवण टाक्यांना मंजुरी मिळाली असून ते काम पूर्ण झाले आहे. परंतु मुळा धरण ते वसंत टेकडी दरम्यान पाईप टाकण्याच्या कामाला अनेक शेतकर्‍यांनी व व्यावसायिकांनी विरोध केला आहे. यासाठी आज प्रत्यक्षात मुळा धरण ते विळद पंपींग स्टेशनपर्यंत सर्व शेतकर्‍यांची व व्यावसायिकांची समजूत काढण्यात आली आहे व ठेकेदाराला या भागामध्ये जलद गतीने पार्डप टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. या कामामध्ये कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस संरक्षणात हे काम केले जाईल, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.

मुळा धरण ते विळद पंपींग स्टेशन दरम्यानच्या अमृत पाणी योजनेच्या कामाची पाहणी खा. सुजय विखे पाटील यांनी केली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती व पाणी योजनेचे समन्वयक मनोज कोतकर, संजय ढोणे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते, इंजि. गणेश गाडळकर, राहुरी व नगरचे प्रांताधिकारी, वनविभागाचे अधिकारी, शेतकरी व विविध खात्याचे प्रमुख तसेच ठेकेदार पानसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, या योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लागून अहमदनगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. कोणी एका व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे या योजनेचे काम थांबविले जाणार नाही. शेतकर्‍यांच्या मालाचा पंचनाम्यानुसार मोबदला दिला आहे. राहिलेल्या शेतकर्‍यांनाही लवकरात लवकर मोबदला दिला जाईल. या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 40 वर्षे नगर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे ते म्हणाले.

या योजनेची पाहणी सकाळी 8 वा. मुळा धरणापासून सुरुवात केली. ठिकठिकाणी शेतकर्‍यांच्या व व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या. त्यांची समजूत काढण्याची प्रयत्न केला. तुमच्या नुकसानीचे पंचनामे करुन तुमचा मोबदला दिला जाईल, ही योजना कोण्या एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण शहरासाठी आहे, असे खा. विखे म्हणाले.