नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासन या भागातील एक किलोमीटर परिसरातील असलेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावणार आहे. याबाबतची तयारी सुरू असून जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर त्यावर कार्यवाही होईल. असे जिल्हा परिषदेचे पशुसवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंबारे यांनी दिली.

गेल्या दहा दिवसांपूर्वी मिडसांगवी (ता.पाथर्डी), निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड (ता.नगर) येथे सुमारे पावणे दोनशे कोंबड्या मृत आढळल्या होत्या. याशिवाय श्रीगोंदे, जामखेड, तसेच नगर तालुक्यात काही वन्य पक्षी मृत सापडले होते. यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.परंतु आतापर्यंत कोंबड्यांमध्ये मात्र बर्ड फ्लू असल्याचे आढळले नव्हते.

दरम्यान, चिचोंडी पाटीलमध्ये मृत झालेल्या कोंबड्यांचा अहवाल बुधवारी (दि.20) रात्री उशिरा प्राप्त झाला. या कोंबड्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला असून प्रशासन अलर्ट झाले आहे.पशुसवर्धन अधिकार्यांसह जिल्हा प्रशासन चिचोंडी पाटील भागातील एक किलोमीटरचा परिसर इफेक्टेड झोन म्हणून घोषित करणार आहे, तसेच या भागात असलेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरया कोंबड्या नष्ट करण्याबाबत निर्णय होणार असून त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा या परिसरात बर्डफ्लू आणखी पसरू नये यासाठी काय खबरदारी घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. या सदर्भात जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी (दि.21) दुपारी तातडीने बैठक बोलावली होती. दुपारी उशिरापर्यंत ही बैठक सुरु होती.