
अहमदनगर : मी दिल्लीत माझ्या नेहमीच्या विषयांसाठी गेलो होतो. पण मी राजीनामा देत आहे, अशी बातमी मला दिल्लीतच समजली.विधानसभेच्या निवडणुका झाल्या,मंत्रीमंडळाचं गठन झालं, त्यावेळी मी विधीमंडळात काँग्रेसचा नेता झालो.त्याचवेळी मी सांगितल होत की,मी प्रदेशाध्यक्ष आहे, विधीमंडळ काँग्रेसचा नेता आहे, तसेच महसूल मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझ्याकडे सगळ्या जबाबदार्या
आहेत, मी सर्व जबाबदार्या चांगल्या पद्धतीने सांभाळेन असे आश्वासनही मी दिले होते. जर कोणाला वाटल की काही जबाबदार्या या इतरांना द्याव्यात,तर माझी त्यासाठी हरकत नाही.
मी सर्व जबाबदार्या एकटाच समर्थपणे सांभाळत आहे. सद्यस्थितीला मी राजीनामा दिलेला नाही, मी प्रदेशाध्यक्ष आहेच. पण तरूणांना जबाबदारी दिली, तर तरूणांच्या पाठीशी मी उभा राहीन असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.एच के पाटील हे महाराष्ट्राचे प्रभारी झाल्यानंतर त्यांनाही माझ्याकडे असलेल्या अनेक जबाबदार्यांबाबतची वस्तुस्थिती मी सांगितली. पण माझ्याकडून जबाबदार्या काढून घेऊन इतरांना सोपावण्याची चर्चा अचानकपणे सुरू झाली असेल, तर त्याचे मी स्वागत करतो.
दिल्लीत माझी या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही, राजीनामा देण्याचा विषयच येत नाही, असे थोरात यांनी बोलताना सांगितले. माझ्याकडे एकाहून अधिक जबाबदार्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ही जबाबदारी विभागून देण्याची साहजिकपणे मागणी होऊ शकते. अनेक जबाबदार्या एकाकडे असतील तर ती वाटून देण्याचे म्हणणे चुकीच नाही. तरूण, धडाडीचा, राज्यभर फिरणारा, पक्षाला पुढे नेणारा नेता या पदावर यावा अशी माझीही अपेक्षा आहे. त्यामुळेच तरूण नेतृत्वाला मी पाठिंबाच देईन असे त्यांनी सांगितले.
