अहमदनगर : मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण द्यावे व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून करण्यात आली. यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे,कडूबाबा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष सलीम सय्यद, नागेश वायदंडे, रफिक शेख, चंद्रकांत सकट, विशाल भालेराव, सुलोचना बहिरट, मंदाकिनी मेंगाळ, रंगनाथ वायदंडे, संजय साळवे,दत्ता शेलार, बंडू पाडळे, नवनाथ उकिरडे, बाबासाहेब शिंदे, बबनराव डोंगरे, भीमा डोंगरे, शांताराम मधे, लक्ष्मण मधे, बाळू मधे, दगडू भले,नाना कांबळे, अविनाश लोंढे, मच्छिंद्र नेटके, सुरज राजगुरू, किरण जावळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात मातंग समाजाची सुमारे 70 लाखांहून अधिक संख्या आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील 13 टक्के आरक्षणापैकी 7 टक्के आरक्षण मातंग समाजाला द्यावे. मातंग समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. दलित समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दीडशेपेक्षा अधिक योजना मंजूर केल्या आहेत. परंतु या योजनांचा लाभ आरक्षणातील प्रमुख जातींनी घेतला आहे. म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन त्याचे अ,ब,क,ड अनुसार वर्गीकरण करण्यात यावे.

सरकारने त्वरित अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करून हजार कोटीचे भागभांडवल देण्यात यावे व राज्यातील सर्व मागासवर्गीय व आदिवासी विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.