अहमदनगर दि. 26 – राजकीय दबावापोटी लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असून, अजूनही त्यांच्यावर व आमच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगर-पाथर्डी रोड भिंगार येथे स्वामी रेसिडेन्सीमध्ये सर्व लॉरेन्स कुटुंबीय एकत्रित राहतात. लॉरेन्स स्वामी यांचे महाराष्ट्रासह इतर राज्यात टोलनाके चालवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे नगर शहरात बर्‍याच प्रभावी राजकीय व इतर लोकांशी व्यावसायिक संबंध असल्याने राजकीय हेवेदावे देखील निर्माण झाले आहेत. लॉरेन्स कुटुंबीय अल्पसंख्यांक समाजातील असल्याने बहुसंख्य गटातील लोकांनी त्रास देण्याच्या हेतूने खोटे गुन्हे दाखल करून छळ करण्याची धमकी यापुर्वी त्यांना दिलेली होती. याबाबत दि.28 सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयासह संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज यापूर्वी देण्यात आला होता. तरी देखील या अर्जाची दखल न घेतल्याने लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु झाले आहे.पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन माझ्या पतीला दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले. दीडशे ते दोनशे पोलिसांचा फौजफाटा घेऊन घराचे दार तोडून पतीला अटक करण्यात आली. त्यांना देशद्रोही असल्यासारखी वागणूक देऊन त्यांची बदनामी करण्यात आली. दि.23 डिसेंबर रोजी सेशन कोर्टाने त्यांना जामीन दिला असता, दुसर्‍या दिवशी दि. 24 डिसेंबर रोजी त्यांना सोडण्यात येणार होते. केवल राजकीय दबावाने व द्वेषातून प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने त्यांच्यावर आनखी एक गुन्हा दाखल केला. त्यांना तुरुंगात निघू न देता त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे. एक महिन्या पुर्वीची खोटी घटना दाखवून फिर्यादी पुरणचंद जोशी यांनी गुन्हा दाखल केला आहे.