
अहमदनगर (दि २४ डिसेंबर २०२०) : अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले होते. व पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत अद्यापही कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने भूजल सर्वेक्षण कार्यालयच्या आवारामध्ये अमरण उपोषण करण्यात आले.
आंदोलनाच्या दुसर्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. मनोज घुगे व डॉ. केव्हारे हे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांना म्हणाले की सुरक्षारक्षकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास तयार आहे. यावेळी कामगार सहाय्यक आयुक्त राऊत, निरीक्षक देवकर,संघटनेचे पदाधिकारी दीपक गुगळे, अमित गांधी, अजय सोळंकी, शहानवाज शेख, संतोष उदमले, सचिन फले, किरण जावळे, शहाबाज शेख, फारुख शेख, मच्छिंद्र गांगुर्डे, मुसेफ शेख, सोमनाथ पवार, व 17 सुरक्षारक्षक उपस्थित होते.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक अविनाश घुले, धनंजय जाधव, सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, स्वाभिमानी कामगार संघटना आदी उपस्थित होते. दोन वर्षापासून अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत 17 सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षारक्षकांनी 7 महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्याचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे 1 कोटी 30 लाख 74 हजार एवढा निधी मागे गेला.
सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर झाले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षारक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षारक्षक विरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसर्या संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षारक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नव्हता पाहिजे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये यासाठी सुरक्षा रक्षक बदलून घेण्याचे ठरविले आहे.
सर्व सुरक्षारक्षक यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते. तरी देखील त्यांना हजर करुन न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचे निवेदनता म्हंटले आहे. तरी तातडीने जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली होती.
