
अहमदनगर (दि २१ डिसेंबवर २०२०) : ज्येष्ठ समाजसेवक पदमभूषण अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे या मागणीसाठी आंदोलनातील शेतकर्यांच्या मुलांनी रविवार दि. 20 डिसेंबर रोजी राळेगणसिद्धीत येत थाळीनाद आंदोलन केले. दिल्लीत आंदोलनास जागा मिळाल्यास शेतकर्यांच्या प्रश्नावर शेवटचे आंदोलन करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांचे समाधान झाले.शेतकर्यांच्या प्रश्नावर दोनदा आंदोलन केले, मोदी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतर मंतर येथे जागा मिळाली तर या प्रश्नावर शेवटचे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी सांगितले.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे यासाठी पंकज प्रकाश श्रीवास्तव (बिहार), रोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदिप मेटी, किरणकुमार वर्मा, सतिशकुमार राज पुरोहित (कर्नाटक) या सहा शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी (20 डिसेंबर) राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेत सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी हजारे बोलत होते.शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत प्रवेश केल्यानंतर थाळी वाजवत आंदोलन करण्यास सुरुवात केली. हजारे यांच्या कार्यालयाकडून अण्णा भेटणार असल्याचे सांगितल्यानंतर थाळीनाद थांबवून त्यांनी हजारे यांची भेट घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसाकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. दिल्ली येथे केंद्र सरकार आंदोलनकर्त्या शेतकर्यांना विविध प्रकारे त्रास देत आहे. या आंदोलनात 22 शेतकरी आतापर्यंत शहिद झाले आहेत. हजारे यांनी दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला तर आंदोलनाची ताकत निश्चितच वाढेल. आपल्याकडे संपूर्ण देश दुसरे गांधी म्हणून पाहत आहेत व तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहेत. अशा भावना शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.
यावेळी हजारे म्हणाले, माझा केंद्र सरकारबरोबर शेतकर्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच आहे. केंद्र सरकारला अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांवर 23 मार्च 2018 ला दिल्लीत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर 30 जानेवारी 2019 ला राळेगण सिद्धीत उपोषण सुरू केले होते. केंद्रीय कृषींमंत्री राधा मोहन सिंग व तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु, केंद्र सरकार दिलेले आश्वासन पाळत नाही. केंद्र सरकारने आश्वासन पाळत नाही. देशातील सर्व जेल ज्यावेळा भरून जातील त्यावेळी खर्या अर्थाने सरकारला जाग येईल. त्यासाठी देशातील शेतक-यांसह सर्व जनतेने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. सरकार जर कोणत्या गोष्टीला घाबरत असेल तर त्यांनी सर्वात जास्त भीती ही पडण्याची असते. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनात देशातील सर्व शेतकर्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे हजारे म्हणाले. यावेळी माजी उपसरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, संजय पठाडे, गणेश भोसले, शाम पठाडे, अमोल झेंडे, अन्सार शेख, सुभाष पठारे, राजाराम गाजरे, सुनिल जाधव, शांताराम जाधव उपस्थित होते.
