अहमदनगर(प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे प्रकाशित होत असलेल्या निशांत दिवाळी अंकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम, पशु संवर्धन, मस्य वन,मृद व जलसंधारण राज्यमंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते व माजी आमदार  राहुलदादा जगताप व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत झाले .यावेळी संपादक निशांत दातीर यांनी गेल्या २० वर्षांपासून नगर जिल्ह्यातून प्रकाशित होत असलेल्या या दिवाळी अंकाचे प्रकाशन यापूर्वी माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब,मा.उपमुख्यमंत्री श्री गोपिनाथ मुंडे,माजी मंत्री श्री प्रा.राम शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती देत   निशांत दिवाळी अंकाची 20 वी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून, डिजिटलायझेशन व इंटरनेटच्या युगातही प्रिंट मिडियाला महत्व देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रिंट स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

     तब्बल सात महिन्यांहून अधिक जगभरात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे यंदाच्या दिवाळी अंकातही ‘कोरोनोत्तर जगण्याला आयाम देतांना’ या विषयांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक हेरंब कुलकर्णी, आरती देशापांडे, चिन्मय प्रभु, डॉ.राजेंद्र बर्वे, सुंदर पिचाई, विजय जोशी या मान्यवरांचे विचार समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘कोरोनोत्तर काळ आणि ग्रामीण अर्थकरण’ यावर डॉ.मुकुंद गायकवाड, प्रा.आश्रुक चौसाळकर, अरुण देशपांडे, तुकाराम भस्मे, चंद्रीका चौहान, देवीदास तुळजापुरकर तर ‘महाआघाडी मॉडेल देशात चालणार’ या विषयांवर ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी, जयदेव डोळे, माजी आ.डॉ.कुमार सप्तर्षी, प्रमोद मुजुमदार, डॉ.उदय निरगुडकर, अतुल लोंढे यांचे विचार व्यक्त करण्यात आले आहेत. सध्याचे ‘नवे शैक्षणिक धोरण काय साधणार’ पंडित विद्यासागर, डॉ.नलिनी पाटील, माणिकराव साळूंके, कृतिका बुरघाटे, प्राची साठे या मान्यवरांचे विचार समाविष्ट करण्यात आले. ‘आम्ही स्वत:ला माणूस बनविले’ या माया साईनकर यांच्या लेखामध्ये जीवनातील अनेक टप्प्यांना उजाळा देण्यात आला आहे.

   पुणे येथील माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिवाळी अंकांच्या राज्यस्तरीय दिवा संमेलनावर अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. येथील पत्रकार सुर्यकांत नेटके यांच्या ‘शेती, शेतकरी आणि संकटाशी लढाई’ या वास्तववादी लेखाने शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या आहेत.  सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, कथा पहिल्या नेत्र शतकाची या विषयावरील अभ्यासपूर्ण अनुभव व्यक्त करण्यात आले आहेत. योगिता टिक्कल यांची ‘लाडाची लेक’ व सुजाता पुरी यांचे ‘आयुष्यावर बोलू काही’ यासह नागेश शेवाळकर यांच्या ‘वाघाच्या डोळ्यात धूळ’ या रहस्यपूर्ण कथेमुळे अंकाची उंची वाढली आहे. प्राचार्य सुर्यकांत वैद्य यांच्या ‘ओंजळभर तिळगुळ’, प्रा.रमाकांत दीक्षित यांचे ‘आमचे घर’ तर डॉ.अंजली श्रीवास्तव यांची ‘एक वाट वेगळी’ या अभ्यासपूर्ण लेखांबरोबरच संपादक निशांत दातीर यांचा वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला ‘बेधुंद रात्रीचे फिरणे’ या लेखांचा समावेश वाचनिय आहे.

     सुप्रसिद्ध ज्योतिष भास्कर, नारायण कारंजकर यांचे राशी भविष्य तर प्रभाकर दीघेवार यांचे ‘मास्क बोलू लागले तर’ व्यंगचित्र मालिका वर्षीच्या अंकात समाविष्ठ करण्यात आलेली आहे. गजलकार व चित्रपट गीतकार श्रीकांत नरुळे, डॉ.सुधा कांकरिया, रमाकांत दीक्षित, स.रा.गोरे, शरद अत्रे, डॉ.सत्यपाल श्रीवास्तव व मितवा श्रीवास्तव यांच्या काव्य मैफिली अंकात अंतर्भुत करण्यात आल्या आहेत.अशी माहिती दिली         

             यावेळी नामदार दत्तात्रय भरणे यांनी या अंकास शुभेच्छा दिल्या. यावेळी कुणाल जायकर मिलिंद देखणे,केदार भोपे ,अर्जुन राजापुरे, विक्रम बनकर,बाबा ढाकणे पत्रकार मंडळींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.