
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांच्या तक्रारीवरून नगरविकास खात्याने या संदर्भातील अहवाल मागितला
अहमदनगर (दि २९ ऑक्टोबर २०२०) : महापालिकेतील काही आठवड्यापूर्वी नियुक्त झालेल्या स्विकृत सदस्यांच्या नियुक्त्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांच्या तक्रारीवरून नगरविकास खात्याने या संदर्भातील अहवाल मागितला आहे. या नियुक्त्या महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार झाल्या किंवा नाही, याचा उल्लेख या अहवालात आवश्यक आहे.मंत्रालयातील कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांच्या सहीने महापालिकेला हा आदेश देण्यात आला आहे.
येथील पाच स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या अगोदरपासून गाजत आहेत. त्यात नगरविकास खात्याने यात लक्ष घातल्याने महापालिकेचा अहवाल काय जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन आठवड्यापूर्वी महापालिकेत पाच सदस्यांच्या पक्षीय बलानुसार नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र ही प्रक्रिया करताना महापालिका अधिनियमानुसार अंमलबजावणी केली नसल्याची तक्रार शेख यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.
या पाचही नियुक्त्या रद्द कराव्यात तसेच त्या करताना कायद्याचे उल्लंघन झाल्याने महापौरांना अपात्र ठरवावे व मनपा आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीची दखल मंत्रालयाने घेतली गेली आहे. पाच स्वीकृत नगरसेवकांच्या झालेल्या नियुक्त्या महाराष्ट्र मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार झाल्या की नाही, याची तपासणी करण्यास नगरविकास खात्याने सांगितले आहे. या पाच नियुक्त्यांची शिफारस आयुक्त मायकलवार यांनी केल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभेत त्यांची नावे जाहीर केली होती.
शिफारस करताना अधिनियमांचे पालन केले किंवा नाही, हे सांगण्याची वेळ आता आयुक्तांवर आली आहे.या नियुक्त्यांची शिफारस करताना संबंधितांचे प्रस्ताव तपासणीस वेळ मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त मायकलवार यांनी दिले होते. मात्र, प्रतिज्ञापत्र घेतले असून,प्रस्तावात दिलेल्या माहितीला ते जबाबदार असल्याचे याद्वारे लिहून घेतले गेले असल्याचे सांगितले. होते. या नियुक्तांच्या प्रस्तावांची तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याने या पाचही नियुक्त्या वादाच्या भोवर्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
आता तपासणी करताना संबंधितांनी ज्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून नोंद केली आहे, त्या संस्थांच्या दप्तराची तसेच त्या संस्थांच्या दैनंदिन कामकाजातील संबंधितांच्या सहभागाची खातरजमा करून शासनाला अहवाल द्यावा लागणार आहे. मात्र, अहमदनगरचे राजकारण पाहता आयुक्त आपणच प्रस्तावित केलेल्या नियुक्त्यांची पुन्हा काटेकोर तपासणी करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक निवडीसाठीच्या नियमात वैद्यकीय व्यावसायिक, वकील, प्राध्यापक-शिक्षक, सनदी लेखापाल, इंजिनिअर, निवृत्त मनपा आयुक्त वा सहायक आयुक्त, सामाजिक कार्यकर्ता आदी क्षेत्रातील प्रत्येकी एका तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती या पदावर करणे गरजेचे आहे, असे शेख यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मागील 1 ऑक्टोबरला मनपाच्या महासभेत राष्ट्रवादीकडून विपूल शेटिया व अॅड. राजू कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव आणि भाजपकडून रामदास आंधळे यांची निवड झाली आहे.
