
दिलीप गांधी यांनी नगर मतदारसंघाच्या विकासासाठी प्रदीर्घकाळ काम केले. पक्षाची संघटना बांधली. खासदार असतांना दिलीप गांधी यांनी जी कामे मंजूर करून आणली ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी आज जे कामे करतोय ते सर्व दिलीप गांधी यांनीच मंजूर केलेली आहेत. मी फक्त धक्का देवून पूर्वत्वाकडे नेत आहे. दिल्लीत त्यांच्या ओळखीचा फायदा होत आहे. शहरातील उड्डाणपुलाचे काही गांधी यांच्यामुळेच मंजूर झाले, मी ते पूर्ण करणार आहे.
खासदार डॉ सुजय विखे पाटील
अहमदनगर (दि २४ ऑक्टोबर २०२०) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य जनतेसाठी लाभाच्या सुरू केलेल्या सर्व योजना भाजपचे पदाधिकारी जनतेपर्यंत घेऊन जात पंतप्रधानाचे स्वप्न पूर्ण करत आहेत. ज्या लाभार्थींना शिफारस पत्र मिळाले, त्यांना येत्या 5-6 दिवसात खात्यात 10 हजार जमा होवून आपला व्यवसाय सुरु करता येईल. छावणी परिषदेमुळे भिंगारचा विकास खुंटला असून कॅन्टोन्मेंट कायदा रद्द झाला पाहिजे, असे मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.भिंगार शहर भाजपच्या वतीने छावणी परिषदेच्या माध्यमातून सर्वे करून निवडलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या 20 लाभार्थीं पथविक्रेत्यांना शिफारस पत्रांचे वाटप खा. डॉ. सुजय विखे, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, भिंगार भाजप मंडलाध्यक्ष वसंत राठोड, नगरसेविका शुभांगी साठे, संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे, भाजप उपाध्यक्ष शिवाजी दहिहंडे, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, गणेश साठे, राकेश भाकरे, जोत्स्ना मुंगी, लक्ष्किांत तिवारी, बिजेस लाड, सचिन दरेकर, महेश झोडगे, वैशाली कटोरे, सलीम बागवान, पोलीस उपनिरीक्षक पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले, भिंगार छावणी परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. 2020 पासून भिंगार वासियांवर घरपट्टी वाढीचा बोजा परिषदेने टाकला आहे. आधीच सर्व जनतेचे कोरोना व लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे घरपट्टी वाढीस माझा विरोध असून त्वरित रद्द करण्याची शिफारस दिल्लीत करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 222 चा प्रश्न प्रलंबित आहे. बोगस ठेकेदारामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जानेवारीपर्यंत भिंगारचे नागरिक मोकळ्या रस्त्याने जाऊ शकतील, यासाठी भिंगार अर्बन बँक ते वेशीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रुंदीकरण व डांबरीकरणाचा प्रश्न सोडवणार आहे. मतदान घेण्यासाठी राजकारण केले नाही, तर सार्वत्रिक विकास करणार आहे. आ. संग्राम जगताप यांच्याशीही चर्चा करणार आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलीप गांधी यांनी पाईपलाईनसाठी निधी मंजूर केला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी मी पाठपुरावा करून हा प्रश्न जानेवारीपर्यंत सुटून एमआयडीसीमधून भिंगारसाठी स्वतंत्र पाईपलाईन केली जाईल. भिंगार मधील पोलीस स्टेशनची जागा चुकीची आहे. त्याच्या स्थलांतरासाठी नव्या पोलीस अधिक्षकांना भेटणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनाच नगरला आणल्याशिवाय संरक्षण खात्याकडील प्रश्न सुटणार नाहीत.
दिलीप गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकट काळात चांगल्या योजना आणून जनतेला मोठा आधार दिला आहे. सावकारीच्या पाशातून सोडवणारी व तुम्हाला आत्मनिर्भर करणारी ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे. बँकेचे पैसे वेळेवर फेडले तर बँक तुमच्या पाठीशी उभी राहून पाच लाखांपर्यंत कर्ज देइल. 130 कोटी जनतेपैकी कोणताही मनुष्य भिक मागणार नाही, हे मोदी यांचे स्वप्न आहे. सर्वांना स्वाभिानाने उभे करत आत्मनिर्भर भारत करत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड असल्याने भिंगारला राज्य सरकारच्या योजनांचा लाभ होत नव्हता. मात्र खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये मी हा अधिकार मिळवून दिला. चटई क्षेत्राच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रास्ताविक वसंत राठोड यांनी केले.
