
अहमदनगर: भारतीय जनता पक्षाचे दिल्ली क्षेत्र अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात लोकपाल चळवळी सारखे आंदोलन उभारण्याचे आवाहन प्रसिद्धी माध्यमांतून केले होते. या आव्हानाला आज हजारे यांनी प्रतिउत्तर दिले असून पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माझ्यासारख्या माणसाला दिल्लीत कशाला बोलावता असा प्रश्न केला आहे.हजारे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 24 ऑगस्ट रोजी आपण लिहिलेले पत्र प्रसारमाध्यमांद्वारे मला प्राप्त झाले. आपण पत्रात लिहिले आहे की तुम्ही दिल्लीत येऊन ‘आप’ पक्षाविरूद्ध लोकपाल चळवळीसारखे आंदोलन करून आवाज उठविला पाहिजे आणि आम्हाला सहकार्य करावे.
प्रेसला लिहिलेले तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमची भारतीय जनता पार्टी मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती आहे. तुमच्या पार्टीमध्ये तरुणांची संख्या मोठी असून जगातील सर्वाधिक पार्टी सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात 10 बाय 12 फूट खोलीत राहणार्या 83 वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते. वाढत्या भ्रष्टाचारामुळे 2011 चे दिल्ली आंदोलन झाले. लोकांना आपले जीवन जगणे कठीण झाले होते. भ्रष्टाचारामुळे जनता अस्वस्थ झाली होती. अशा परिस्थितीत अण्णा हजारे यांच्यासारखा व्यक्ती आपल्यासाठी आंदोलन करत आहेत असा विचार करून दिल्ली आणि देशातील लोक रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर 2014 मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. एका पक्ष-पार्टीला नेहमी दुसर्या पक्ष-पार्टीचा दोष दिसतो. कधीकधी एखाद्या पक्ष-पार्टीने स्वत: आत्मपरिक्षण करून स्वतःच्या दोषांविरूद्ध बोलले पाहिजे. वयाच्या 83 व्या वर्षी मी समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी 22 वर्षांपासून अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केले आहेत. 20 वेळा उपोषण केले आहे. आजपर्यंतच्या आंदोलनामुळे सहा मंत्र्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. सत्तेवरून पायउतार झालेल्या मंत्र्यांमध्ये विविध पक्षाचे मंत्री आहेत. मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत.
सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे : अण्णा हजारे
मला कोणत्याही पक्ष आणि पार्टीचे घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो आहे. सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे. आज अनेक पक्ष-पार्टी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही. अशी माझी धारणा आहे. देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल, असेही हजारे यांनी म्हटले आहे.
