
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत झाली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिली.शेतकऱ्यांवर आपण उपकार करतो आहोत, अशा भावनेतून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करू नका, तर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे, अशा भावनेतून मदत करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केली आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करायची आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षां निवासस्थानी आयोजित बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यात आला.
या योजनेच्या अंमलबजावणीची संबंधित विभागाने तसेच प्रशासकीय यंत्रणेने किती तयारी केली आहे, याचीही या वेळी माहिती घेण्यात आली. या योजनेकडे देशाचे लक्ष आहे, त्यामुळे एकदा अंमलबजावणी सुरू झाली की, आपण त्याचा दररोज आढावा घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफी योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या ३५ दिवसांत केले. इतक्या अल्पावधीत कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची तयारी केली त्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. योजनेच्या अंमलबजावणीची तयारी करताना येणाऱ्या लहान लहान तांत्रिक समस्यांचेही निराकरण करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांची गर्दी होईल, अशा वेळी योग्य ते नियोजन करावे व शेतकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधा, त्यांचे म्हणणे ऐका, अडचणी दूर करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर १५ एप्रिलपर्यंत योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या योजनेतील ८८ टक्के पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ३२ लाख १६ हजार २७८ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंद केली आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.
