UDHAV THAKREY

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी सुसंगत नसून, वास्तवाचे भान हरपलेला आहे. देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची बोचरी टीका मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.IDBI आणि LIC मधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात तसेच काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे.२०३० मध्ये भारत हा सर्वात युवा देश होणार असून या युवा शक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग या अर्थसंकल्पातून विकसित होतांना दिसत नाही. पर्यटन क्षेत्र ज्यातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतात, त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे.

शेती क्षेत्रासाठी १६ सुत्री कार्यक्रम जाहीर करून ₹२.८३लाख कोटींची तरतूद या क्षेत्राला उपलब्ध केली.प्रत्यक्षात ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा थोडीच वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून व्यक्त केलेले संकल्प व त्याच्या सिद्धीसाठी केलेल्या वित्तीय तरतूदी यात विरोधाभास दिसतो.